चोचौचंचः जे मनात उमटतं ते तसं तसंच्या तसंच

Wednesday, November 11, 2009

ही आहे अवंतीची कविता (मी केवळ निमित्तमात्र)

मी एक आठवण ......

मी एक आठवण ......
तुझे हसणे
एक आठवण
तुझे जाणे
एक आठवण
तुला स्मरणे
एक आठवण
तुला गमावणे
एक आठवण
आता फक्त सरण
आणि सोबत मरण
ही तुझ्यासाठी साठवण

मी, मी एक आठवण ......

प्र......साद जोशी
पुणे
10.11.2009

Sunday, November 8, 2009

मी तसाच ..........................

साद दिली
याद आली
ओ नाही
मी तसाच

घरटे पडले
पिल्लू एकाकी
आई हरली
मी तसाच

कुणा सांगावे
जग सुकलेले
प्रयत्न संपले
मी तसाच

पाकळ्या जमिनीवर
फुले कोमेजलेली
झाडही पडले
मी तसाच

मी सरणावर
लाकडे सर्व ओली
वाट पाहणे आले
मी तसाच

मी तसाच ..........................

प्र .............. साद जोशी
पुणे
०९.११.२००९

Friday, October 23, 2009

मी कां अन् कोण कुणी सांगावे ?

मी सर्वत्र
मी निमित्तमात्र
मी एक सुख
मी दाटलेले दुःख
मी फाटलेली डायरी
मी रिकामी कुयरी
मी गाळलेला शब्द
मी अक्खा निबंध
मी तरी सर्वत्र
मी जीवंत मात्र
मी कां जगात
मी कां सुखात
मी मानतो मी आहे
मी जाणतो कुणी आहे
मी कोण कुणी सांगावे
मी कां मला सांगावे
मी जरी मी आहे
मी कां अन् कोण कुणी सांगावे ?

प्र.....साद जोशी
पुणे
२४.१०.२००९

Tuesday, October 13, 2009

जीवंत असल्याची जाणीव

एकदा एका राज्यात निवडणूक झाली
मी एकटाच उभा होतो उमेदवार म्हणुन
सभापती पण मीच आणि निर्वाचन आयोग पण मीच होतो
नागरीक तसे खूप होते पण मतदान करणारा पण मीच होतो !

फार विचित्र झाली निवडणूक, अगदी एका मतानी जिंकलो मी
कुणीच हारतुरे आणले नाहीत की बैंडबाजा वाजला नाही
मीच माझी शपथ घेतली आणि त्या स्मशानभूमीचा मुख्यमंत्री झालो
आता प्रत्येक येणारया नागरिकाला मला दान देवूनच जायला लागणार

मी पण प्रत्येक नागरीक कसा जळतोय, याची नीट शहानिशा करणार
काहीही झाले तरी मुख्यमंत्री म्हणून माझ्याही काही जबाबदारया आहेत की नाही?
प्रत्येक जण नीट मेला की मी वोटर लिस्ट मधून त्याचे नाव कमी नाही करणार
मी त्याचे नाव जन्माच्या नोंदणीला पाठवणार, एक वोटर माझ्याच लिस्ट मध्ये वाढवणार

काही वर्षांनी परत निवडणूका येणार, माझे टिकिट मी माझ्या मुलाला देणार
आता माझे वय झालेय, या पुढे स्मशानाची काळजी माझा मुलगा घेणार
या राज्याचे स्मशान झाल्याचे कधीच कुणाला नाही समजणार
कारण अगदी स्पष्ट आहे, जीवंत असल्याची जाणीव आम्ही कुणालाच नाही होऊ देणार

कारण अगदी स्पष्ट आहे, जीवंत असल्याची जाणीव आम्ही कुणालाच नाही होऊ देणार

प्र....साद जोशी
पुणे
१३.०१०.२००९

Wednesday, September 23, 2009

काही असंच

मी सांधा , तू रंधा
मी हाक , तू धाक

प्र....साद जोशी
पुणे
२३.०९.२००९

Monday, September 21, 2009

नेमकी त्याचवेळी ही अशी कां वागते ?

त्या वेळेचे गणित मला कधी कळत नाही,
नेमकी त्याचवेळी ही अशी कां वागते ?

गरज म्हणावी तर तिलाही असते
आवड म्हणावी तर मलाही असते
आम्हा दोघांची सांगड़ काही बसत नाही
नेमकी त्याचवेळी ही अशी कां वागते ?

मी समुद्र म्हणालो की तिला भेळ आठवते
मी रेतीचे घर म्हणालो की तिच्या डोळ्यात पाणी दाटते
वागावे तरी नक्की कसे मला काही कळत नाही
नेमकी त्याचवेळी ही अशी कां वागते ?

आज राख राख होवुनही तिचेच स्वप्न मनात असते
तिचं तिकडं येणे होतही असावे, मला कधी कळत नाही
सर्व काही संपल्यावर, ती म्हणते की तुझ्याखेरिज एक क्षण जात नाही
मला मात्र कधीच कळत नाही, नेमकी त्याचवेळी ही अशी कां वागते ?

प्र....साद जोशी
पुणे
२२.०९.२००९

Thursday, September 3, 2009

आज उपकारांवर उपकार करून आलो

आज उपकारांवर उपकार करून आलो
मी माझे सर्वस्व दान करून आलो
कुणी मानती पैसा सर्वस्व,कुणी मानती मान सर्वस्व
तसेच आलो उपकार करून

मानाचेही दान दिले अन् पैसेही दान केले
उपकार मात्र तसेच ठेवून आलो
जणू ठेवावे गुप्त धन जपून
तसेच आलो उपकार करून

जाण असावी वा जाण नसावी
कर्त्तव्य माझे मी करून आलो
नकळत वळलो अंधारातून
तसेच आलो उपकार करून !!!

प्र......साद जोशी
पुणे
०३.०९.२००९

Saturday, August 29, 2009

तो तसाच बस मधून निघून गेला !!!

तो तसाच बस मधून निघून गेला !!!

आजचा दिवस पण असाच आला अन् फुकट गेला
एक जण थाम्बलेला स्टॉप वर खूप वेळ पण फायदा नाही झाला
रेट पण कमी करून पाहिला, बराच वेळ त्याच्या मागे गेला
पण काही फायदा नाही झाला, तो तसाच बस मधून निघून गेला !

तो खरं तर त्यातला वाटत नव्हता, पण प्रयत्न तर करून पाहिला
दोन दिवस झाले होते एक पण खरेच धंदा झाला नव्हता
पोटासाठी तो स्टॉपच माझ्या एरिया मधला होता
पण काही फायदा नाही झाला, तो तसाच बस मधून निघून गेला !

पण साला बरे झाले तो निघून गेला, दोनच मिनिटानी एक गाडीवाला आला
दोन काय चार दिवस धंदा नाही केला तरी चालेल असा माल देवून गेला
आपल्या डोक्यात अजुन तोच साधा माणूस राहुनच गेला
उगीच बिचारयाला अर्धा तास त्रास दिला, आपले नशीब आपल्याला पैसा देवून गेला

पण काही फायदा नाही झाला, तो तसाच बस मधून निघून गेला
सोबत आपली घुसमट मात्र घेवून नक्की गेला
प्रत्येक सिगरेट सोबत त्याला होणारा वैताग त्याच्या चेहरयावर दिसत होता
बरं झालं माझा काही फायदा नाही झाला, तो तसाच बस मधून निघून गेला

बरं झालं माझा काही फायदा नाही झाला, तो तसाच बस मधून निघून गेला
कमीतकमी एक माणूस आपल्या या चक्रात नाही अडकला, थोडं समाधान देवून गेला
आता चार दिवस तो विचार करेल माझा उगीचच माझं काय झाल्याचा
करुदे विचार बिचारयाला, समाधान माझं मोठं आहे , तो तसाच बस मधून निघून गेला !!!

प्र....साद जोशी

पुणे
३०.०८.२००९

पाखरांची वाट कां पाहतोस रे ?

आठवणी बांधावरच ठेवून बघ एकदा,
कधी मैत्रीचा सांधा जुळतो कां ?
रेशीमगाठी न् उलगड़ता अशाच ठेव
स्नेहाचे बंध कधी सुटतील कां ?

चाकोरी तुझीच तू ठरवलीस,
वज्रप्रहार होवुनच कां दिलास ?
निस्वार्थ जगायचे ठरले होते मग
पाखरांची वाट कां पाहतोस रे ?

प्र...साद जोशी
पुणे
२९.०८.२००९

Friday, August 28, 2009

कुणीतरी कधीतरी समजुन घेइल नां ?

तुला सोडायला आलो आहे ..
नातं थोडं तोडू नकोस
डोळे ओले होऊ देऊ नकोस
हट्ट करू नकोस मन घट्ट करायचा
घट्टच करायचा असेल तर निर्धार कर

सई जाईच्या वेलाशी थांबली असेल
सर्व बन्धान्ना निर्बंध कर
मन घट्ट करून सईला आपलेसं कर
तिचं अजुन लग्न व्ह्यायचं आहे नां ?

घुसमट स्वत:ची थाम्बवुन टाक
ऐक आता तरी सईची हाक
मोठेपणा घेउन साध्य काहीच होत नाही
दोघे सुखी होण्यासाठी एकत्र यायला हवं नां?

आज जर दिली नाहीस हाकेला ओ
कधीच कुणी सुखी होणार नाही
तीन आयुष्य कां मित्रा संपवतो आहेस
कुणीतरी कधीतरी समजुन घेइल नां ?

प्र....साद जोशी
पुणे
२९.०८.२००९

असतील , आहेत कित्येक सोबत, परी सोबतीला कुणी नाही

मन कुणास उमगावे, कसे सांगावे उमगत नाही
असतील , आहेत कित्येक सोबत, परी सोबतीला कुणी नाही
कुणा समजावे कसे सांगावे , उमगत नाही
असतील , आहेत कित्येक सोबत, परी सोबतीला कुणी नाही

मी व्यर्थ आहे, की हे जगणे व्यर्थ आहे, उमगत नाही
प्रत्येकाच्या इछेला मान द्यावा की मान झुकवावी उमगत नाही
स्वत्व सांगते वाग आपल्या इछेप्रमाणे, काय करावे उमगत नाही
असतील , आहेत कित्येक सोबत, परी सोबतीला कुणी नाही

मी जाळत जावे, की जळतच रहावे उमगत नाही
मी माझ्या मरणाला कवेत घ्यावे की चितेत ह्या झोकुन द्यावे उमगत नाही
चित्त म्हणावे की अवचित म्हणावे, काय करावे उमगत नाही
असतील , आहेत कित्येक सोबत, परी सोबतीला कुणी नाही

मी आहे हा असाच आहे, कां कुणा उमगत नाही?
मी असाच सरणावर सरणार आहे, हे कुणासही उमगणार नाही
राख राख होईल जेव्हा, उमगेल कदाचित जीवंत होता
जगला कसा अन् गेला कसा कधी कुणास उमगणार नाही

असतील , आहेत कित्येक सोबत, परी सोबतीला कुणी नाही ...............

प्र.........साद जोशी
पुणे
२८.०८.२००९

Saturday, August 22, 2009

जर तसे असेल तर मी खरे सांगू कां अन् काय ?

या चौकोनी कोनात मी कितवा कोण ?
कां हा चौकोन नाहीयेच मुळी,
त्रिकोणाचा एक कोंन आहे मी ?
जर तसे असेल तर मी खरे सांगू कां अन् काय ?

जगतोय जगतोय म्हणताहेत सगळे
श्वास सुद्धा मीच घेतो आहे
जगण्याला या काही अर्थ आहे कां ?
जर तसे असेल तर मी खरे सांगू कां अन् काय ?

मी मी म्हणताना माझा मी कधी उरलोच नव्हतो
तुला तुझा मी कधी वाटलोच नाही
या जगण्याचे गमक कसे शोधू मी ?
जर तसे असेल तर मी खरे सांगू कां अन् काय ?

राख होवुनी उडालो जेव्हा, तेव्हा डोळे तुझे चुरचुरले
डोळ्यात काही गेले म्हणुनी, की लोकांसमोर तसे करावे लागले
या सगळ्या गोष्टींचा मी अर्थ काढू तरी काय ?
जर तसे असेल तर मी खरे सांगू कां अन् काय ?

आता त्रिकोण उरला नाही
श्वास सुद्धा मी घेतच नाही
माझ्यासाठी लिहायला दोन रेषा ठेवून जातोय
या पलिकडे मी आता खरे सांगू तरी काय ?

प्र.....साद जोशी
पुणे
२३.०८.२००९

Friday, August 14, 2009

स्वातंत्र्य

स्वातंत्र्य म्हणजे सदुपयोग
स्वातंत्र्य म्हणजे निराकरण
स्वातंत्र्य म्हणजे विषादयोग
स्वातंत्र्य म्हणजे उदाहरण
स्वातंत्र्य म्हणजे स्वत:ला जाणणे
स्वातंत्र्य म्हणजे सर्वांना जपणे !

प्र....साद
पुणे
१५.०८.२००९

Thursday, July 30, 2009

आता माझ्या स्वप्नालाही मी आपलसं केलं!!!

काल रात्री माझ्या स्वप्नाला एक स्वप्न पडलं
माझं म्हणे कुणाशीतरी लग्न झालं
बाशिंग तसं मी बांधून तयारच होतो
पण बरं झालं माझं एकदाचं लग्न झालं

स्वप्नातल्या मीच मला हळूच उठवलं
पडत्या अंतरपाटातून तिला आपलसं केलं
मित्रांनी उचललं तेव्हा मी जरा चिडलो होतो
पण बरं झालं माझं एकदाचं लग्न झालं

मी मला चिमटा काढून हळूच जागं केलं
चादर बाजूला करून हलकेच बाजुला पाहिलं
सहा जणांच्या रूम मध्ये मी एकटाच जागा होतो
पण बरं झालं माझं अश्यावेळी माझं लग्न नाही झालं

आंघोळ करून मी स्वत:ला सत्यात आणलं
एक स्वत:ची जागा हवी हे मलाच मी सांगितलं
मला समजले लग्न म्हणजे जबाबदारीचा डोंगर असतो
म्हणुन म्हणतो बरं झालं माझं अश्यावेळी माझं लग्न नाही झालं

आज माझं खरंखुरं लग्न झालं आहे
एक पिल्लाची जबाबदारी अंगावर आहे
कामावरून बायको शप्पथ दमून येते
पिल्लू रात्रभर जागलं तरी मला जागणे आहे

आता नाही वाटत मला लग्न का झालं
नक्की झेपेल मला कितीही ओझं जगण्याचं असलं
लग्न म्हणजे सुखदुःखाचं देणं घेणं असतं
आता माझ्या स्वप्नालाही मी आपलसं केलं

आता माझ्या स्वप्नालाही मी आपलसं केलं

प्र....साद जोशी
पुणे
३१.०७.२००९

Monday, July 27, 2009

मला काय त्याचे ? मी तर केव्हाच घर गाठले होते !

आज एक विचित्र अपघात घडला म्हणे
कुणीतरी त्या ट्रक खाली आला म्हणे
मला त्याचे काय करायचे ? मी बाजुनी निघून आलो
मला काय त्याचे ? मला लवकर घर गाठायचे होते !

हजार तरी अपघात होत असतात हल्ली रोज रस्त्यात
आपण तरी कुठे कुठे थाम्बयाचं ? अन् कशासाठी ?
नीट नाही नां चालवता येत गाड़ी मग बसनी फिरावं की
मला काय त्याचे ? मला लवकर घर गाठायचे होते !

आज तसा एकदम ख़ास दिवस आहे माझ्यासाठी
पगार वाढला हे सुद्धा सांगायचे आहे आणि तिचं पण
सारखं सारखं डोळ्यासमोर त्या अपघातानी यावं कशाला ?
मला काय त्याचे ? मला लवकर घर गाठायचे होते !

घरी आलो तर इमारतीत एकच हलकल्लोळ माजला होता
कुणाचातरी म्हणे अपघातात जीव गेला होता
आयला म्हणजे मगाशी जो अपघात पहायचे टाळले होते
मला काय त्याचे ? मला लवकर घर गाठायचे होते !

तड़क तसाच वर आमच्या मजल्यावर आलो
गोंधळ आमच्याच घरात उडाला होता असे दिसले
भान हरपत होते पण सावरले स्वत:ला आणि पुढे झालो
मला काय त्याचे ? मी तर केव्हाच घर गाठले होते !

मला काय त्याचे ? मी तर केव्हाच घर गाठले होते !

प्र......साद
पुणे
२८.०७.२००९

Monday, July 20, 2009

खडक

खड़क
मी दिसतोही
मी असतोही
मी स्तब्ध
मी निशब्द
मी पाण्यात
मी जमिनीवर
मी खोलात खोल
मी गर्त अनमोल
मी एकटा
मी निर्बंध
मी भिजलेला
मी सुकलेला
मी आकार
मी विकार
मी हरवलेला
मी गवसलेला
मी गुंग पाण्यात
मी धुंद लाटात
मी ज्वाला एक थंड
मी निसटलेला खंड
मी शांत निर्माल्य
मी प्रशांत खडक ..............

प्र.... साद जोशी
पुणे
२०.०७.२००९

Sunday, July 19, 2009

कारण तो समुद्राकाठचा खड़क !

एकटा जरी तो, तरी निर्भय
कारण तो समुद्राकाठचा खड़क !
झीजणे त्याचे, वरी शेवाळ
कारण तो समुद्राकाठचा खड़क !
मौनाचे असे भांडार, जरी पायी कालवे
कारण तो समुद्राकाठचा खड़क !
मी मुग्ध होउनी बसतो, दरी खोर्यातुनी फिरून
कारण तो समुद्राकाठचा खड़क !
मी चिम्ब चिम्ब हा भिजतो, घेतो कात नवीन
कारण तो समुद्राकाठचा खड़क !

प्र.....साद
पुणे
२०.०७ .२००९

Friday, July 10, 2009

साथ तुम्हारे खु़दा तो है !

शिकवा कभी न् करना
गैर तो गैर होते है ,
रुसवाई अगर है खुदसे
साथ तुम्हारे खु़दा तो है !

Thursday, July 9, 2009

बरे झाले गेलीस तू ,

ओळखीचा सूर होता
जीवघेणा वार होता
माझीच ती कट्यार होती
काळ वेळ लावित होता
.......
बरे झाले गेलीस तू ,

आरसा भंगुन गेला
अन् तडे सोबतीला
पखरण त्या तुकड्यांची
घरभर पसरली होती
.......
बरे झाले गेलीस तू ,

सरण माझे मीच नेतो
मीच देतो अग्नी मला
राख सुद्धा सरकली नाही
वाराही तेव्हा स्तब्ध होता
.....
बरे झाले गेलीस तू ,

प्र....साद जोशी
पुणे
१०.०७.२००९

Wednesday, July 8, 2009

शेवटची कविता !!!

प्राजक्त माझा बहरत होता
कोण जाणे कशी सावली आली !
सडा आता पडणार नाही
वेळ मावळण्याची आली !

फुले पारीजातकाची केशरी हात माझे
राहिले आता मात्र कोरडे !
मी रमलो या ठिकाणी
वेळ निघण्याची आली !

कृपा करा अन् जाऊद्या मला आता
केली न् गायली भूपाळी जेथे !
उमगली किम्मत स्वत:ची
वेळ सरून गेली !

वेळ मावळण्याची आली !

प्र....साद जोशी
पुणे

०९.०७.२००९

Monday, July 6, 2009

प्रत्येकाच्या आयुष्यात एक् बाबा यायला हवा,

नव्हती आशा बदलाची कधीच कुणाला,
मलाही होती शंका जो वरी बाबा नाही भेटला !
मी म्हणालो त्याला मी प्रयत्न करीनच,
हसला अन् म्हणाला हे ही दिवस जातीलच !

कृपा असावी असे नव्हते कधी वाटले,
त्याचा हात फिरता अश्रु मात्र सांडले !
म्हणाला मला मान मागुन मिळणार नाही,
स्वत:हुन द्यावे मग अपमान नाही !

स्वत: द्यायची सवय कधीच नव्हती,
हात उठतो कशाला याची जाणीव मात्र होती !
अशक्याचे शक्य होते हे त्यानेच दावले,
मदतीचे हात अनेक पुढे आले !

विश्वास बसेना माझ्याच नयनावर,
भीड़ चेपली करू स्वत: लागल्यावर !
नाणे दोन बाजुंचे असते अशी समजूत होती,
दान आपलेसुद्धा पडेल याची कायम भीती !

आरसा दाखवेल कुणी माझा मला सुधारलेला,
यावरी विश्वास बसायला मात्र वेळ गेला !
बदल घडेल माझ्यात कधी असे कधीच नव्हते वाटले,
दुसरेही विसम्बले मदतीकरीता अश्रु डोळा दाटले !

प्रत्येकाच्या आयुष्यात एक् बाबा यायला हवा,
देवानेही प्रत्येकाला दिला असतो प्रकाशाचा दिवा !
पेटवावा दिवा उजेडाकरीता न् वापरता जाळण्यासाठी,
उमगले काठी उगारण्यासाठी नसतेच असते ती फक्त सोबतीसाठी !

प्र.....साद जोशी
पुणे
०६.०७.२००९

Saturday, July 4, 2009

मीपण जपायचं की माझं स्वत्व

मी हटायचे की हट्टाने रेटायचे
प्रश्न तसाच राहतो
भीड़ चेपायची की भीक घालायची
प्रश्न तसाच राहतो

मीपण जपायचं की माझं स्वत्व
प्रश्न तसाच राहतो
कुढत जगायचं की जगवायचं अस्तित्व
प्रश्न तसाच राहतो

अभिमान जपायचा की स्वाभिमान
प्रश्न तसाच राहतो
मोडून वाकायचं की वाकून मोडायचं
प्रश्न तसाच राहतो

पेटून उठायचं की कुणीतरी पेटायचं
प्रश्न तसाच राहतो
झोकुन द्यायचं की वाकून पहायचं
प्रश्न तसाच राहतो

आपणच आपलेपण सिद्ध करायचे
विस्तव आला तरी स्वत्व आता जपायचे
शिवबा नाही होता आले हे तर चालायचेच
नंगी तलवार उचलता येते एवढे तरी करायचे

मग प्रश्न कधी प्रश्न उरणार नाहीत
उत्तरे कुणाकडे मागावी लागणार नाहीत
आता फक्त ताठ कणा अन् मानानं जगायचं
पाठीवरचा वार छातीवर घ्यायला फक्त शिकायचं

प्र.........साद जोशी
पुणे
०५.०७.२००९

सांग आवरू कसा हा पसारा ?

कैफात मी धुंद होतो
होता केलास तेव्हा तू इशारा
गेलीस आता सोडुनी
सांग आवरू कसा हा पसारा ?

pra....saad

अश्वत्थामा अमर आहे

आठवणी मेणबत्ती सारख्या
हातात घेवून फिरत रहातो
उजेड जगाला देतो
चटके हाताला घेतो

हीच साठवण आहे
तुझ्या आठवाची
जगणे जगत रहातो
मरण पेलत जगतो

उपयोग नाही कशाचाच
सर्व काही व्यर्थ आहे
जखम भाळी घेवूनच
अश्वत्थामा अमर आहे

प्र....साद जोशी
पुणे
०४.०७.२००९

Friday, July 3, 2009

मी नसतोच ...........

मी झंझावात
मी वादळ
मी निरभ्र
मी मळभ
मी सर्वांगी
मी विरागी
मी भैरवी
मी विराणी
मी तूच
मी नसतोच ...........

प्र.......साद जोशी
पुणे
०४.०७.२००९

विस्कळीत

1)
मी गडद ,
मी गर्द !
मी सहज ,
मी सर्द !
मी दृश्य ,
मी अस्पष्ट !
मी मर्त्य ,
मी स्वप्न !

2)
एक आवर्त , कधीच न उमगणारे
एक सत्य कधीच न उलगडलेले
एक किनारा थांग न सापड़णारा
एक अन्याय कधीच न थांबणारा
एक माणूस सतत लढणारा
एक कोळी सतत झुंज देणारा
एक राधेय स्वत्व अन् अस्तित्व विसरणारा !

प्रसाद जोशी.
१४.०४.2009

3)

मी तीर्थ
मी सर्वार्थ
मी जळी
मी स्थळी
मी आवेग
मी संकल्प
मी झंझावत
मी विकल्प

Thursday, July 2, 2009

जगाने जगला म्हणावे !!!

जगाने जगला म्हणावे !!!

डोळ्यातूनच जे झिरपते तेच अश्रु असतात कां ?
मनातल्या मनात जे झिरपते त्याला काय म्हणावे ?
जे जे दिसते ते ते सत्य असतेच कां ?
जे जे कळते कधी उमगते त्याला काय म्हणावे ?

आस असावी की कास धरावी कुणी तरी सांगेल कां ?
घुसमट होते आतल्या आत त्याला काय म्हणावे ?
प्रतिसाद द्यावा की वाट पहावी सादेची कां ?
हाकेस सुद्धा ओ न यावी याला काय म्हणावे ?

चालत रहावे की थाम्बुन जावे कुणीतरी सुचवेल कां ?
वाट आंधळी की रस्ता चुकलेला याला काय म्हणावे ?
जीवन जाते सरुनी तरी कां जगलो उमगेल कां ?
कलेवराची राख न उरली, जगलो कसे म्हणावे ?

प्र.....साद जोशी
पुणे
०२.०७.२००९

Wednesday, July 1, 2009

कॉलेज

कॉलेज

नाक्यावर उभे राहून आमचे जेव्हा टेबल पंखे व्ह्यायचे नां तेव्हा आम्ही सुटलेलं कॉलेज पहायचो ,

या टोकापासून त्या टोकापर्यंत ती जाइतो आम्ही फक्त पहातच रहायचो !
टोक एकदा शेवटचं यायचं , मग तिनं मागं फिरून पहायचं ,
गेल्याची खात्री झाली की आम्ही परत पहिल्या टोकाकडे टक लावून रहायचं !

नाक्याच्या त्या जागेवर माझा ठरलेला स्पॉट होता ,
अनेक ग्रुप यायचे अन् जायचे माझा दिव्याचा खाम्ब असायचा !
सीनियर आणि ज्युनिअर कॉलेजच्या वेळा मला त्या काळी पाठ होत्या ,
माझी सिगरेट आणि चहाची वेळ ठरलेला भट कधीच नाही चुकवयाचा !

बाबांची यायची ट्रेन प्रत्येकाला ठाउक होती त्यावेळी ,
माझी सिगरेट आपोआप दुसरयाच्या हातात सहज ठरवल्यागत जायची !
आई मात्र यायची भाजी खरेदीला चुकून कधीही वेळी अवेळी
अख्या ग्रुपची मला जपायला तारांबळ फक्त त्याच वेळी उडायची !

घातलेली जीन धुवून किती महीने झाले याची काही मोजदात नसायची ,
चुकून घातली नाही की मगच ती जीन पाण्यात जायची !
अधून मधून कॉलेजच्या कैन्टीनला आम्ही पण जायचो ,
टेबलाचे तबले कधी झाले हे न कळताच परत यायचो !

आज बायकोसोबत फिरताना माझा टेबल पंखा होत नाही ,
एक कटिंग मारतोस कां अशी हाक सुद्धा येत नाही !
कड़ेवरच्या छोकरीला त्रास होईल म्हणुन सिगरेट हातात धरत नाही !
हल्ली मुलींनी काका अशी हाक मारली तरी त्रास काहीच होत नाही !

दिवस जुने सरले होते , आठव सोबत उरले होते ,
प्रत्येक मित्र आता दुरूनच हात करतो !
ठाउक असते मलासुद्धा आता असेच वागायचे ,
उगाच कशाला जुन्या गोष्टींना उगाळत बसायचे !

ठाउक असते मलासुद्धा आता असेच वागायचे ,
उगाच कशाला जुन्या गोष्टींना उगाळत बसायचे !

प्र.............साद जोशी
पुणे
०५.०६.२००९

Thursday, June 25, 2009

कातरवेळ


मन उधाण असते
रेती सरकत असते
जीवात जीव नसतो
ती कातरवेळ

तू हलकेच येतेस
हातात हात अलगत देतेस
हात सुटून कधी जातो उमगत नाही
ती कातरवेळ

भरती मनासारखी
ओहोटी तुझ्यासारखी
मनात काहुर कां उठते कळत नाही
ती कातरवेळ

संध्याकाळ रात्रीच्या गर्तेत जाते
मी अन् माझे मन तसेच राहते
रात्र दिवसात कधी बदलून जाते कळत नाही
ती कातरवेळ

कधीतरी कुठल्या लाटेसोबत देह माझा
तुझ्याच बेटावर सापडतो लोकांना
तो सोबत असतो म्हणुन तुला ओळख देता येत नाही
तीच अन् तीच उरते कातरवेळ !!!

प्र .......साद जोशी
पुणे
२६.०६.२००९

Saturday, June 20, 2009

उपरा

मी तर जगतो जगासारखा
कां तरीही मी प्रेमास पारखा
काहीच उमगत नाही
मी मलाच समजलो नाही
खरेच कां मी उपरा ?

रान्गेतुनी त्या सरकत होतो
जगण्याचा खेळ खेळीत होतो
डाव मी माझा मांडीत होतो
लोक डाव साधुनी जात होते
खरेच कां मी उपरा ?

ती तशीच यायची रान्गेतुनी
डोळ्यात तिच्याही भय दिसायचे
मला कधीच ना उमगयाचे
मी तर सामान्य होतो , तरी
खरेच कां मी उपरा ?

रान्गेतुनी त्या अनेक होते
तिची छेड काढणे चालूच होते
तो क्षण आला , अन् तिडिक गेली
उचलला दगड अन् पुढचे ........
खरेच कां मी उपरा ?

मी माझ्या बाह्य स्वरूपावरून गजाआड़ होतो
तिची कशाला यात फरफट म्हणुन काहीच बोललो नाही
परत दातांखाली ओठ घेतले दाबुन ,
आमची होती खुन्नस खूप वर्षांपासून सांगुन टाकले
खरेच कां मी उपरा ?

...... हल्ली रांग तशीच असते
मी सुद्धा असतो अधून मधून
...... ती पण दिसते तशी रोजच
मी मात्र पाहतो कधी वाटले तर
कारण मी तर उपरा नां ?

प्र........साद जोशी
पुणे
२१.०६.२००९

अता बरस रे मेघा !

आतुरले मन, काहूर उठले
जगणे अशक्य झाले
जरीही दमले, पाउल सरकले
बरस रे मेघा !

नयनात माझिया मेघ
वरी पापण्याची रेघ
परी उरात सर्व दबवले
बरस रे मेघा !

कुणी पुसतच नाही
मी चालतेच आहे
पिल्लांचे जीवही शीणले
बरस रे मेघा !

दारी पोचले, घर सापडले
चूल पेटणे, भाकरी आहे
मी तर दमले आहे
बरस रे मेघा !

आई म्हणुनी हाक ऐकता
उर दाटूनच आहे
भाकर झाली घास भरवला
अता बरस रे मेघा !

आजचा हा दिवसही सरला
उद्याची हाकही आहे
रात्र झाली, डोळे मिटले पिल्लांचे
अता बरस रे मेघा !

अता बरस रे मेघा !


प्र.....साद जोशी
पुणे
२१.०६.२००९

Friday, June 12, 2009

शब्द तसेच राहिले!!!

जीव गुंतला त्या माळलेल्या गजरयावरती
गुंफून गेले श्वास जणू तो मोगरा होता
थाम्बुन गेलो पुढे न सरलो कणभर भीती
सूर उमटले ओठांवरती

तीही थबकली किंचित वळली कोपरयावरती
पाहिले जेव्हा तिने फिरुनी , एकच तो क्षण होता
उमगले ना श्वास बिलगला , वेडा होता
सूर उमटले ओठांवरती

कधीच ना मी कबुली दिली स्वत:शीच पण
जाणवते आजही मला , मी तो क्षण जिंकला होता
माझाच माझ्या जिंकण्यावर विश्वास नव्हता
अन् ... सूर उमटले ओठांवरती

प्र...साद जोशी
पुणे
१३.०६.२००९

प्रेम की ती जबरदस्ती

प्रेम की ती जबरदस्ती

धुरान्ची वलये कायम यायची तिकडच्या टेबलावरून
जीव कायम धडकत असायचा आमचा त्यांना पाहून
कैंटीन मध्ये तर जायला लागायचे आम्हाला अधिमधी
नजर फक्त त्याचीच नाही खुपायची तिथे पाहून

एकदा तो जवळ येउन म्हणाला काही नोट्स मिळतील कां ?
मनापासून नाही म्हणायचे होते पण जमलेच नाही
परत भेट घडावी वाटत सुद्धा होते आणि नाही सुद्धा
प्रत्यक्ष आला जेव्हा समोरी शब्द ओठी उमटले नाही

एकदा ती भीती माझी सत्यात जेव्हा उतरली
मला त्याच्या डोळ्यांची जरब नाही वाटली
प्रेमात म्हणे विचारतात असे ऐकले होते
त्याने प्रेम आहे माझ्यावरी दोन शब्दात सांगितले

प्रेम की ती जबरदस्ती काहीच नाही समजले
काळजी कुणी कशी करावी हे मात्र उमगले
त्याचे नाव कॉलेज मध्ये नव्हते फारसे चांगले
मला वेडीला प्रेमात हे कधीच नाही वाटले

एक मात्र तो दिवस आला , लख्ख झाला वर्तमान
सर्व स्वच्छ दिसू लागले , सुरा चालला गतीमान
धूसर झाल्या प्रेमाच्या माझ्या सारया कल्पना
जीव होता अन् क्षणात गेला बाकी सर्व वल्गना

जीव वाहिला तुझ्यावरी असे एकदा बोलला होता
पाट रक्ताचे पाहिले मी पण एकही थेम्ब माझ्या नावाचा नव्हता
आजवरी प्रेम या शब्दाची भीतीच मजला वाटते
रोज हल्ली बहिण माझी आरश्यात पाहते ......

प्र..............साद जोशी
पुणे
१३.०६.२००९

Tuesday, June 9, 2009

रंग

1)

रंगुनी रंगात सगळ्या , रंग मुक्त केले बंद मी ,
तू जरी नसलास सोबती , स्पर्श केले बद्ध मी !
मी तशी कुणीच नव्हते , कधी कुणाची ,
फक्त आहे जीवनी या , मुक्तीसाठी लुब्ध मी !
हा स्वर आला अन् तो क्षण सरला एवढे उरले जरी ,
गुंजन असता मुक्तीचे , काहुर कायम असे उरी !

2)

त्या गहिरया रंगांच्या संगतीने संगतीचे रंग गहिरे झाले ,
पावसात नाह्ताना बंध सैल जाहले ,
एक एक अश्रु आता रंग होऊ लागला ,
शब्द शब्द रंग म्हणुनी कागदी उमटू लागला !!!

विस्कळीत

1)पहावयाला तयास गेलो ,
मनमौजी तो तसाच होता !
काळजीचे सूर मनातच राहिले ,
मज भूपाळी तो ऐकवित होता !

2)गणेशाचे या ध्यान करावे की ,
त्या कुम्भाराचे मौन पाहावे !
कलाकृतीला दाद द्यावी की ,
मौनाचे त्या प्रतिसाद व्हावे !

3)गुन्तवली आयुष्याची भेडोंळी ,
कधी सरळ तर कधी गुंतागुंतीची !
कधी तयार होते बाहुली तर कधी नुसतीच उरते सावली ,
कर्तव्याचा खेळ हा सारा , कधी कर्म तर कधी माउली !!!

ध्यानस्थ

तुझे मन तर निर्मळ ,
जणू वाहत्या पाण्याची झूळझूळ ,
कां खड्कानी होतेस अस्वस्थ ?
रहा त्या खडकावर ध्यानस्थ !

अंगणातील तुळस

बोलल्यावाचूनही उमगले जे सर्व काही वाटले ,
नयन तुझे ते बोलले जे माझ्या मनी दाटले !
स्पर्शातुनी तुझ्या रोमांच अंगी माझ्या उमटले ,
नक्षत्रांचे देणे आले कुठुनी अन् कोठले !

उदार तुझ्या शपथा अन् त्यावर सर्वस्वी हा जीव वाहिला ,
पिंजर्यातील जीव माझा मुळी माझाच न राहिला !
भेट तुझी घडणार नाही , ठाउक आहे मला मुळी ,
येशील मात्र स्वनात माझ्या ही आशा नाही खुळी !

जुळलेल्या सर्व तारा , खनक तुझ्या पैनणाची ,
किणकिणते कानात माझ्या , रुणझुण तुझ्या कंगणाची !
मिळूनही सर्व सारे , वेळ वाटे मागण्याची ,
सोबतीस साद घाले , तुळस माझ्या अंगणाची !

कधी पाहिलं आहे कां कुणी ?

मऊ लोकरीची वीण कधी उलगडून पाहिली आहे का ?
माझ्या पोटातलं ओठावर आलेलं कधी पाहीलेय का ?
मी नक्की कसा आणि कोण हे कधी पाहीलेय कुणी ?
तू मात्र असाच आहेस हे पदोपदी ठसवले क्षणोक्षणी !!!

भय मात्र वाटते !

वाहत्या पाण्याचे कधीच नव्हते भय मला ,
पाण्यातील ओंडक्यांचे भय मात्र वाटते !
सोबतीची साथ हवी असा माझा हट्ट नसतो ,
गरज सरता सोडून जाण्याचे भय मात्र वाटते !

भैरवी

कुणी गाताना भैरवी , दिल्या वचनांची शपथ जीवघेणी असते गं ,
उसवलेल्या शिवणीची सल नकळत हातात रुतते गं !
तसा मी तुझा कुणीच नव्हतो असेही म्हणता येईल गं ,
बोटावर झेललेला तो अश्रुचा थेम्ब मनतळ गाठून येतो गं !
ते क्षण सरले अन् कुणीच न् उरले , आपले कुणाला म्हणू गं ,
मीही तोच तुही तीच , भवताल मात्र अजून विराणच गं !
मन सांगे एक करावे , उमेद नाही उरली गं ,
सांग अता तूच मला गायलीस कां ती भैरवी गं !

दुःख घर थाटतंय...

दुखः सुद्धा अता सुखा सारखे वाटायला लागलेय,
मनालाही ते अता आपलेसे वाटायला लागलेय !
वादळसुद्धा अत्ता अत्ता माणसासारखे वागायला लागलेय ,
झंझावात आला तरी हल्ली फुंकर वाटू लागलेय !
मनामध्ये हळूहळू
दुःख घर थाटतंय...

सावली

आरश्यात दाविली मी तुला एकदा सावली ,
ती सुद्धा तुझ्याच मागे धावली !
साद घातली होती तेव्हा मी तुला ,
म्हणालीस की ओ द्यायची राहुनच गेली !

गृहीत

मी तुला गृहीत धरून बसलो,
आयुष्यात एकदाच पण शेवटचा फसलो !
मी कधी मांडली नव्हती गणिते आपल्या सोबतीची ,
सोबत मात्र शेवटपर्यंत असेल अश्या भ्रमात राहिलो !
तशी सोबतीची सवय जडली होती ,
उगाच नको त्या गोष्टींमध्ये तुला शोधत बसलो !
आता काय उगीच शब्द बापुडे व्यर्थ जातील ,
मी मला हरवले , स्मशानात शोधत राहिलो !
हातास काही लागत नाहिये बराच वेळ झाला ,
मी वेडापीर म्हणुन जगत राहिलो अन् दगड झेलत राहिलो !

प्रसाद जोशी
22.05.2009
पुणे

कणा

कणा

जे घडेल ते पाहत नाही बसायचे , बदलून टाकायचे जग सहन कशाला करायचं ?
आयुष्य आपल्याला हवं तसचं जगायचं असतं !
कशासाठी थाम्बायाचं ? आपण जिथून सुरु केलं तिथून जग सुरु करायचं !
आयुष्य आपल्याला हवं तसचं जगायचं असतं !
कुणीच नसतं निस्वार्थी , प्रत्येक जण स्वार्थ साधत असतो , तुम्हाला फक्त ते कळत नसतं !
आयुष्य आपल्याला हवं तसचं जगायचं असतं !
मोकळ केलं मन , फुटू दिले अश्रुंचे बांध , मग आपोआप हसता अन् हसवता येतं !
आयुष्य आपल्याला हवं तसचं जगायचं असतं !
पंखान्मध्ये बळ आलं तरी घरटं सोडायचं नसतं , एक अजुन नवं घरटं बांधायचं असतं !
आयुष्य आपल्याला हवं तसचं जगायचं असतं !
मरण दान मागायला आलं तर दान देवून नक्की टाकायचं ,
शरमेनी मान मरणाची झुकावी असचं वागायचं असतं !
आयुष्य आपल्याला हवं तसचं जगायचं असतं !
कशाला वाकायचं कुणासमोर , जग सोडून जातानाही ताठ कणा ठेवूनच जायचं
आयुष्य आपल्याला हवं तसचं जगायचं असतं !

आयुष्य आपल्याला हवं तसचं जगायचं असतं !

प्र .............साद
पुणे
०३.०६.२००९

ओळख !

ओळख !

तुम्ही कायम अश्याच वागता कां ? की फ़क्त अनोळखी लोकान्शीच न बोलता राहता ?
अनोळखी म्हणाल तर आपण एकमेकांना गेले दोन तास पाहतोय हो नाही कां ?
लाजली नाही बुजली ती , काहेच न बोलता हलकेच निघून गेली ती दुसरया वर्गात
मी तालीम घ्यायचो त्याच कॉलेज मध्ये तिच्याच मित्रांची नाटकासाठी तिसरयाच वर्गात !

तिची सुद्धा तालीम सुरु होती , आमच्या तालमीला तिचे सूर लाभायाचे
सर्वजण तालमीत गुंग असताना मी मात्र फ़क्त तिलाच ऐकायचो
कॉलेज मधला एकेक दिवस उगाचच सरायला लागला
तिच्या खळितल्या हसण्यात जीव गुन्तायला लागला !

मी होतो एक खुशालचेंडू , ती कायम गंभीर
विचारू कसं प्रेमाचं ? मन होतं नव्हतं खंबीर
मनापासून मनाला समजावलं ,एकदाचं विचारून टाकलं
काय सांगू मित्रांनो , आयुष्यातलं शेवटचं आश्यर्य घडलं !

तिनं हो म्हटलं आणि जग होत्याचं नव्हतं झालं
प्रेम करावं कसं हे मलाही समजू लागलं
प्रत्येक गोष्ट आता तिला पहिले समजायची
मग कधीतरी मलाच माझी ती थोडीशी उमगायची !

हे थोडेसे उमगणे नंतर नंतर कोडे वाटू लागले
कोडे सुटता सुटत नाही म्हणुन दोर सैल होऊ लागले
तिला खोटं आवडायचं नाही मला कधी समजले नाही
तिला त्रास नको म्हणुन मी संपूर्ण खरं म्हणुन बोलायचो नाही !

सुरुवात जरी मी केली तरी शेवट तिच्याच हातात होता
वीण अशी उसवून टाकली की दोरही माझ्या हाती नव्हता
सर्व काही संपल्याचा फ़क्त एक निरोप आला
उत्तर सुद्धा न घेता निरोप देणारा गेला !

आज अनेक वर्षांनी परत एकदा गाठ पडली
तिला कोडी सोडवायची होती घाई जडली
मी पण आता गुंतलो होतो माझ्या संसारात
परत कुणाला फसवावे जमणार नव्हते जन्मात

मी सगळ्या चूका माझ्याच म्हणुन सांगितल्या
शेवटचे खोटे बोललो , तिच्या भावना आवरल्या
एक खोट्या बोलण्यानी सर्व मार्गावर आले
दोन जीवांसाठी दोन संसार मोलाचे ठरले !

आजही आम्ही कधी मधी समोर येतो
ओळखतो एकमेकांना एवढेच दाखवतो
ती आता तिच्या मुलात मला शोधते , अन् जवळ घेते
माझ्याही बायकोला भेटली तर , तिच्या खांद्यावर देते !

नक्की चुकले कुठं याचा विचार आता मी करत नाही
मला त्रास होतोय याचा हे सुद्धा कुणाला समजू देत नाही
कळ जाते कधीतरी एकदाच एकदम जीवघेणी
आरशात पाहतो मी माझीच नजर केविलवाणी !

प्र...............साद जोशी
पुणे
०५.०६.२००९

वात्सल्याचं देणं

1)

माता !

कुणाला लक्ष्मणाच्या आईचं नाव आठवतयं काहो ?
वनवासाला जाताना तिनंही फोडला असेल टाहो !
लक्ष्मणाची उर्मिला आठवते कधी का कुणाला ?
लवकुशासारखे मूल व्हावे वाटले असेल नां तिला !
मात्रुत्वाचा अपमान झाला म्हणुन धरित्रिने सीतेला उदरात घेतले ,
जीवंतपणी अनेक मृत्यु उर्मिलेने भोगले !
जीव दशरथाचा जडला , कैकयीला एक वर दिधला ,
माता होती वर वापरला , कोपून तिच्यावरी भरत मात्र चुकला !
तिचे देणे वात्सल्याचे होते यात मुळी शंकाच नाही मजला
मांगल्य होते की नव्हते या निर्णयाचा हक्क नाही आपुला !

2)

राधेय !

वरदान लाभले तिजला , पण शाप सोबती जडला ,
तो आला जरी जन्मास , सोडुनी त्यास तिने दिधला !
मग तपे लोटली अनेक , जीव व्याकुळच राहिला ,
दान दिले न मातेचे , लागले दान मागायला !

पुत्र तिचा तो थोरच ठरला , दिल्या दानाला जागला
पाच पुत्र तसेच राहिले , चक्र अन् प्राण मात्र रुतला !
काय कहाणी कशी विराणी त्या कुंती मातेची
कुणी न पुसले अश्रुही थिजले , राधेला कुणीना पुसले !

गेल्यावरती प्रश्न न उरला , तो कौन्तेय की राधेय ,
त्या तीरावरती अर्घ्य सुद्धा न त्यास कुणी निधला !
जरी जन्मला कुंतीपोटी , जीव राधेचा होता ,
प्रश्नच न उरला तो कौन्तेय की राधेय , पुत्र राधेचा निजला !

प्र ......... साद जोशी
पुणे
३१.०५.२००९

3)

चार चक्रे घुमती त्या मिश्रणाकरीता
पाउल पड़ते पुढे घमेले टाकण्याकरीता
लक्ष मात्र तिचे त्या झोळीकड़े फिरता
हलकेच पान्हा ओथंबतो त्या पिलाकरिता !

मग मुकदमाची हाक , फिरते पाउल मागे
पदर भिजुनिया जातो , लक्ष न कामात लागे
राहून जाते देणे , दाण्याची आग पोटात
वात्सल्याचे मांगल्य होते , दिसती दोन घास ओठात !

जात न उरते पात न उरते , ध्यास तिचा घास कमवणे
उरते फक्त भुकेची आग , घमेली ओतीत जाणे
ओठातली रेती , पोटातच जाते उरते दुर्लक्ष करणे
ममत्व सारे उरीच शमते , मग कसे स्मरावे वात्सल्याचे देणे !

प्रसाद जोशी
पुणे
२५.०५.२००९

4)

एका उनाडश्या कोपरयावर

त्या चार खान्म्बानमधून फिरत होतो उगीचच ,
राखेतुनी तिला शोधीत होतो उगीचच !
गुरूजी आले , मुठभर राख अन् अश्म घेवुन चला म्हणाले ,
आठवणीन्ची राख होत नाही , सगळ्या लोकांना पुढे व्हा म्हणालो !

एका उनाडश्या कोपरयावर चहा बिडी , तिने जाताना नक्की पाहिलं होतं
मी मानसिक तयारी करून गेलो , ताट आवडीच्या पदार्थांनी सजलं होतं !
जेवण झालं , खूप मज्जा आली , समोर सिगरेटचं पाकीट होतं ,
ती आई होती , समजुन सुद्धा न समजल्या सारखं वागणं तिला अवगत होतं !

श्वास कुणाच्या हातात नसतो म्हणतात , चुकीचं आहे ,
ती नळी काढायची की ठेवायची विचारलं , श्वास माझ्या कुडीचा आहे !
निर्णय कठोर होवून घ्यावाच लागतो , चुकीचं आहे ,
ती जगावी की जावी , हे तिच्या ती आयुष्याचं देणं आहे !

वात्सल्याचं देणं अजुन पुरेसं देवून व्ह्यायचं होतं ,
आईचं जगणं त्या नळीवर अवलंबून होतं !
तिथेपण तिनं मला अड़वलं नाही , निर्णय मला घ्यावाच लागला नाही ,
निघून गेली अलगद कळलं सुद्धा नाही , देणं देण्याची वेळ माझ्यावर आलीच नाही !

एक बोचणी कायमची राहिली माझ्या उरात ,
कधीच कुणाला कळली नाही !
वात्सल्याचं देणं अजुन पुरेसं देवून व्ह्यायचं होतं ,
तिचं असं जाणं माझचं मला पटलं नाही !

प्रसाद जोशी
पुणे
२५.०५.२००९

5)

वात्सल्य की मातृत्व

कदाचीत तिच्या ओटीत कधी मात्रुत्वाचं देणं नव्हतं ,
वात्सल्याची तिच्याकडे कधी कमी नव्हती !
हे देणं मागावं तर कुणाकड़े अन् कसं ?
आपल्या लोकांनी दिलं तर ते दान कसं ?

एक दिवस तिच्या नजरेस ती पडली ,
खंतावनारी नजर तिची पटकिनी खुलली !
मागणे न लाजता तिने मागुन टाकले ,
यशोदे रुच्यापाने होसुद्धा तिने म्हणुन टाकले !

मग मात्र सुरु झाले मात्रुत्वाचे खेळ ,
दिवस तिला गेले हिला पुरत नव्हता वेळ !
मग एकदाची ती वेळ आली ,
मूर्तिमंत दान देण्याची वेळ तिच्यावर आली !

तराजू आता अचानक एका बाजूला कलायला लागला ,
वात्सल्य की मातृत्व यांचा लढा वाढायला लागला !
वात्सल्यानी पोट भरणार नाही याची खात्री होती तिला ,
देणं देण्याची वेळ आली हे काही मान्य होत नव्हते तिला !

वात्सल्य अन् मातृत्व अता कागदोपत्री आलं ,
त्या पिल्लाचं मात्र एक खेळणे झाले !
दोन दिवसांचा जीव मुक्यानेच बोलू लागला ,
मला दोन आया आहेत असे जगाला सांगू लागला !

तिला अन् हिला त्याची भाषा काही कळत नव्हती ,
त्याला यांची तगमग अत्ता समजणार नव्हती !
वात्सल्याचं देणं मोठं की मात्रुत्वाचं यावर एकमत होतं नव्हतं ,
भुकेसाठी कुठे पहावं त्याला कळत नव्हतं !

मग मात्र एकदा त्याचा टाहो कुणालाच ऐकू आला नाही ,
भांडणाच्या नादात त्याच्याकडे लक्षच गेले नाही !
वात्सल्य की मातृत्व याचा वाद काही संपेना ,
देवानं दिलेलं देणं कधी परत वाटेवर गेलं कुणालाच उमगेना !

आता फ़क्त काहूर उरलं ,
देणं की घेणं सर्वच संपलं !
मातृत्व तर त्याचक्षणी कोलमडलं ,
वात्सल्याचं देणं द्यायचंच राहून गेलं !!!

प्रसाद जोशी
पुणे
२३.०५.२००९

शीळ तीच घालतो , एकटा पुन्हा पुन्हा

हे मला होते समजले , आवर घालायचा मना
व्ह्यायचे ते अश्रु आता , फ़क्त पावसात पुन्हा
पाउस वेडा जीवघेणा , जागवतोय सर्व जुन्या खुणा
मीच मला सावरतो , आठवुनी जुन्या शपथा पुन्हा

एक तीच वेळ होती , समजले कधीच नाही जना
मीच जखमा लपवितो , रिचवुनी पेले पुन्हा
दिसतेस बाजारात आता , ओळख ना काही खुणा
सारतेस बट तशीच , सहन करतो त्रास पुन्हा

मी कसा होतो , ठाउक होते फक्त माझ्या मना
त्यास देखिल गप्प करितो , झाला प्रेमाचा गुन्हा
फिरुनी तसाच सावलीच्या , चालतोच कुणाविना
शीळ तीच घालतो , एकटा पुन्हा पुन्हा

शीळ तीच घालतो , एकटा पुन्हा पुन्हा

प्र...............साद जोशी
०८.०६.२००९
पुणे

ही म्हणे त्याच्या प्रेमात पडली

स्वप्नातला राजकुमार कधी नसतोच मुळी
कायम सांगायच्या मैत्रीणी आहेस तू खुळी
तिचे वास्तव तिच्या ताईच्या स्वप्नासोबत विरले होते
तिच्या दृष्टीने प्रेमबीम सगळे एकदम झूठ होते

कसा कोण जाणे तो तिच्या एकाएकी समोरी आला
तिच्या वह्या एका दिवसासाठी द्याल कां म्हणाला
नाही तिला म्हणवले नाही , कसे ते तिला कळलेच नाही
स्वप्नातही त्याची खळी , सकाळच्या आरश्यातुनही गेली नाही

मग तो येतच राहिला , आयुष्याचा भाग बनला
व्यापून टाकले आयुष्य , तो फक्त तिचा उरला
वापर होतोय समजत होते , उमजत मात्र काहीच नव्हते
उमजण्याचे वय नव्हते , त्याने तिला फक्त वापरले होते

आजही खळी पाहिली की तिच्या मस्तकात तिडीक जाते
पुरुष जातीवरती प्रत्येक कार्यक्रमात ती जहाल बोलते
दर कार्यक्रमानंतर तिचा खूप उदो उदो होतो
घरी आल्यावर तिचा आरसा फक्त तिच्याशीच बोलतो

फसवले त्याने यात काही शंकाच नाही
आपण फसतोय हे तिला समजले नाही
चूक तर हिच्याकडून घडली
ही म्हणे त्याच्या प्रेमात पडली

प्र................साद जोशी
पुणे
०८.०६.२००९

सूर उमटले ओठांवरती

सूर उमटले ओठांवरती

साद तिची कानी येता
सूर उमटले ओठांवरती
प्रतिसाद द्यावा वाटला तेव्हा
शब्द संपले !

याद आलीच तिची आता
सूर उमटले ओठांवरती
दर्द दाटला कंठात तेव्हा
शब्द संपले !

लय एकटी ती जगते गाता
सूर उमटले ओठांवरती
कवितेचे गाणे झाले तेव्हा
शब्द संपले !

माझे मीपण न उरले आता
सूर उमटले ओठांवरती
कविता राख झाली तेव्हा
शब्द संपले !