चोचौचंचः जे मनात उमटतं ते तसं तसंच्या तसंच

Monday, February 3, 2014

प्रत्येक गोष्ट काळी किंवा पांढरी

प्रत्येक गोष्ट काळी किंवा पांढरी असते किंवा असावी असं वाटतं तरी कारण हे जे काही ग्रे असतं असं म्हणतात त्याला ठाम अशी बाजूच नसते ...
अर्थात हे इतकं वैयक्तिक म्हणा नाहीतर एकांगी म्हणा पण मला स्वताला हे असंच असतं असं खात्रीनं वाटतं !!!

मोदीचं राजकारण धर्मांध आहे
केजरीवाल मुर्खशिरोमणी आहे
मनमोहन सिंग अबोल बाहुला आहे
या आणि याच धर्तीवर
राज - उद्धव
आबा - बाबा
काका - पुतण्या
पासून
करुणानिधी - स्टालिन
किंवा
फ़ारुख - उमर अब्दुल्ला
या सर्वांच्या बाबत आपलं मत तसंच

काहीही फरक न करता आपण फक्त दूषणं देत रोजचं आयुष्य ढकलत असतो

एकट्या दुकट्या चोराला पकडायचे सोडाच पण वाट वाकडी करुन ते जे काही घडलंच नाही आणि घडलं असल्यास बघितलं नाही अश्या वृत्तीचा अखंड पुरस्कार करणारे आपण

काही तारतम्य असेल किंवा नसेल पण

घराच्या परसावात संडास बांधा सांगायला विद्या चालते
एंटरटेनमेंट  एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट
बोलणारी विद्या आवडते
मग एखाद्या अगम्य निकषानी पद्म पुरस्कार मिळाला ह्याचा पोटशूळ कां ?

लहान रेघेच्या बाजूला मोठी रेघ आखायची कुवत असेल कां नसेल हे नंतर बघू पण मोठी रेघ बनू शकेल याचा विचार करायची सिध्दता बाळगत नाही हेही लक्ष न देता बाजूला टाकायची म्हटलं तरी ...

अनेक कैनवास आहेत आणि अनेक भिंती आहेत

आपण आपली 'स्व' ची अशी एक रेघ मारुन बघायचा विचार तरी आणतो कां कधी मनात???

जर आपल्याच बिल्डिंगच्या कुठल्याश्या संडास / बाथरुमच्या खिडकीतून आलेल्या स्यानिटरी न्यापकिनचे हिरव्या / लाल कागदांच्या विरुद्ध बोलायला एखाद दोन जिने चढून जाण्याचे धाडस न करणारे आपण सर्व ...

फक्त विद्या बालन किंवा सैफशी आपलं वाकडं होण्याचा संभव नाही म्हणून अकलेचे (???) तारे तोडत असतो आणि दाभोल(ळ)करांना यांच्या सोबत मिळालं म्हणून खोटी आसवं पण ढाळत सुट्टी सार्थकी लावतो

सबंध जगात फक्त आणि फक्त अन्याय होतो आहे याचा डंका मारत फिरणारे आपण आज सोसायटीच्या साध्या जनरल बॉडी मीटिंगला जाणं कुणाच्या लग्नाच्या कितव्याश्या गोष्टीतल्या रेशीमगाठी उलगडत बघत बसतो की सून कुणाच्या घरची होणार ते ...

समाज , आपापल्या शहरातील रस्ते आणि त्याकडे होणारी अनास्था याकडे घसा खरवडून बोलतो पण आज बिल्डिंगमधली कॉमन दिवा गेल्यावर घरातला आणून लावायचं सोडाच पण स्वतः पदाधिकारयाच्या घरी जाऊन सांगायचं सोडून कधीमधि दिसणार्या रखवालदाराची वाट बघतो

आणि लवकर बदला असं पण डाफरतो ...

मी , माझं घर , घराच्या भिंती आणि सूर्यासारखे स्वयंप्रकाशित आरसे (घरातल्या काचा म्हणा हवं तर)

आरसा नेमका त्या भिंतीवर अडकवलेला असायचा खिळ्यावर,

आरश्याचा खिळ्यासाठीचा भाग आणि भिंत अगदी एकरूप होते 

माझा चेहरा, तिच्या टिकल्या आणि त्या सोबत आरश्यानं दडवून ठेवलेलं मागचं सगळं अगदी स्पष्ट असलं तरी कायम अदृश्य असायचं  शेंदूर पुसट होत गेला , 
आरश्यातला पारा काळाच्या वेगात आपला स्थायीभाव सोडत गेला आणि रासायनिक विशेषत्व हातचे न सोडू देता त्याला जसं जमेल तसा रहात गेला. 

आणि  त्यासोबत आरश्यामागची भिंत मात्र अधिकच ठाशीव आणि रंगीत आपल्या मालकी भिंतीच्या मूळ रंगाशी इमान राखत राहिली ... 
अगदी एखाद्या गावठी कुत्र्यागत एकेकाळी रुबाबदार असलेल्या पण आता डोळ्यात फुल पडलेलं आणि अंगभर लूत लागलेली असल्यानं कुणीच जवळ फिरकू देत नसल्यासारखी  भगवान साक्षात्कार देतात तेव्हा त्यांना हव्या त्या रुपात देतात नां तसा आमचा टांगलेला आरसा वागायला लागला ... म्हणजे पाठभर उटणं फासलेला दिवाळीच्या अभ्यंगाला माझा देह होतो तसा अगदी तसाच...

आरसा शेंदूर गायब होत असताना आरश्याच्या मूळ स्वरूपाचे म्हणजे निरभ्र काचेचे दर्शन द्यायला लागला  द्वैत अद्वैताचा कायमचा खेळ जणु !  आणि पारा ???  पारा आमच्या नात्यातल्या गहिरेपणासारखा हरवत राहिला सालागणीक दिवसागणीक काहीदा अगदी क्षणांगणीक  ... 

एक दिवस म्हणजे कदाचित आजचीच सकाळ असावी ती ... 

आरसा लख्ख झाला  माझा चेहरा एकदम खडबडीत दिसायला लागला नेमका मागच्या भिंतीसारखा फक्त काचेच्या एका बाजूला शून्य रंग होते आणि दुसऱ्या बाजूला रंगांची उधळण होती  पारा घरभर झाला ... 
निदान पाऱ्याला शोधायच्या निमित्ताने माझा दाढीच्या ब्रशपर्यंत असणारा आणि तिचा सोपस्कारी टिकलीपर्यंत पोचणारा हात एकमेकांना स्पर्श करते झाले  आरसा नेमका त्याक्षणी बोलका झाला आणि पारा केराच्या कोपरयात केरसुणीपाशी जाऊन थबकला  आरश्याची चौकट म्हणजे ती फ्रेम हो !

नव्यानं बनवून घ्यायला हवी  ती फ्रेम...

भिंतीत रुतलेल्या खिळ्य़ाचं आणि आमचं नसेल सख्य फारसं तरीही आठवडयातून तीनदा धुवायला घेतो अश्या रुमलाचं आणि पाण्याचं जाम सख्य आहे ... 
हल्ली पारा घरभर हुंदडत असतो त्याच्या मर्जीनं  आरश्याचा नुकताच मी चष्मा बनवून घेतलाय   भिंतीचं काय हो !  

नव्या मुलाम्यासोबत नवा रंग मिरवतेय षटकोनी घरातली प्रत्येक भिंत  

षटकोनी खोलीच्या आठी भिंती आपापले रंग मिरवताना दिसतात फक्त एकमेकांना भेटणारया कोनांवर आरशी रंग न चुकता सारखे असतात, भासतात ... 


फक्त एकच नियम असतो बरं कां !!!  ज्यानं त्यानं आपापला दिसणारा आणि न दिसणारा चष्मा काढून मगच हा कोपरा न्याहाळायचा ... 

मग आपापल्या घरातल्या अनिश्चित अश्या कोपरयांसाठी मनात भरभरुन न्यायचा हवा तितका रंग ... 

अर्थात ज्याचं जितकं मन मोठं तितका रंग नेण्याची शक्यता अधिक ... 

© प्र...साद जोशी

समज असतो समाज नावाचा ...

समज असतो समाज नावाचा ...


संवेदना एकट्याची असली नां की बरं होतं
ती वेदना म्हणा किंवा संवेदना म्हणा
तिचं टोचणं तिचं बोचणं
हे जसं असेल ते कसं असेल ते सर्वच्या सर्व  खूप वैयक्तिक राहतं
(हेच खरंतर बरं असतं असं खूप काळानंतर समजतं ज्याचं त्याला जेव्हा समजून घेण्याची तयारी झाली की आणि वेळ नेमकी सरुन गेली की मगच)
बोलण्यानं मन हलकंबिलकं होतं म्हणे
उगाच चोचले साले मनबिन नावाच्या बिन अस्तित्वाच्या एका आभासी कल्पनेचा अजून एक आविष्कार ...
आपलेच आपण पुरवत बसायचं असतं खरं तर पण तसं केलं तर आपण आपली कुटुंबाची व्याख्या बदलेल बिदलेल की काय याची फुका काळजी वाहतो जो तो
आणि चूक झालेली असतेच तिच्यावर हळदीच्या ऐवजी मीठाचा मारा सुरु करतो ...
काय सांगू कां दोस्तहो ?
आपलं आपणच जखम कुरवाळण्याचा कंटाळा आला नां की ...
कुणीतरी लागतं कधी हळदवालं, कुणी मीठवालं कुणी पट्टी बांधणारं
कुणी उगाच उभं राहतं
खरं तर ते बघे असतात नां ? त्यातलं प्रत्येक जण आपल्या जखमेची आणि दिसत्या जखमेची तुलना करुन बघतात, बघत बसतात आणि
प्रत्येक जण आपल्या पद्धतीनं एकच वाक्य उच्चारतं आणि आल्यागेल्या वाटेवर निघून जातं
" हे नां ? हे तर काहीच नाही राव !!! "
अजून एक सांगतो जाताजाता
आपापल्या जखमेला कुरवाळून झालं की बरं वाटतं मग कितीही कित्येकांनी मलमपट्टी केली असली तरी ...

शायद जिंदगी जीना इसीका नाम है ।

ज्या ज्या व्यक्तींवर आपण जीवापाड प्रेम करतो
किंवा
जे जे कुणी आपल्यावर जीवापाड प्रेम करतं
या दोन्ही स्थितीत एक भावना अत्यंत स्पष्ट असते ती म्हणजे निरपेक्षता !!!
आता या सगळ्यात काहीही किंवा काहीच अपेक्षा नसतातच असं नाहीये खरं तर पण एक नक्की की त्या सर्व क्षणांचा दरवळ सोबत बाळगूनच जगत असतो आपण किम्बहुना मी एखाद धाडसी पाऊल पुढं टाकून म्हणेन की त्या दरवळाच्या जोरावर खूप नको नको ते सहन करु शकतो आपण ...
कारण आपण एकमेकांवर उधळलेला हरेक, प्रत्येक आणि एकेक क्षण सुरेख आणि सुरेल असतो आणि तो तसाच राहतो आयुष्यभर...
असे अगणित क्षण सोबतीला असताना नेमकेपणानं आपण लक्षात काय ठेवतो ?
आपल्याकडून कळत नकळत घडलेल्या चुकांची बेरीज ?
कधीमधी वजाबाकी देखील
खरंच असे नुसते स्मरले तरी सुखावह वाटणारे  अनेक क्षण गणतीच्या पलीकडे असताना ते एक विचित्र क्षणी उचलेललं चुकीचं पाऊल
किंवा नको त्यावेळी नको तिथं आणि नको तेव्हा टाळ्याला लागलेली जीभ अन् त्यातून उच्चारला गेलेला शब्द ?
हे आणि हेच कां ध्यानात ठेवतो आपण ???
नेमका चुकलेला सूर
नेमकी चुकलेली तान
नेमका
नेमका
आणि
नेमका
एक खवट दाणा येण्याच्या भीतीनं शेंगदाणे खाणं सोडतो कां आपण ?
भूतकाळात बाळाला चालवायचं गणित हुकवलं असतं तर आज धावत्या ट्रेनपासून ट्रैकपर्यन्त कुणी, कुणीच धावू शकला नसता दोस्तहो !
आजच्या दिवशी नथुरामचे गुणगान किंवा गांधीजींची भलावण
इतकंच भूतकालीन ज्ञान ?
वार्षिक दोनवेळा आंबेडकर ?
दारुच्या आठवणीपुरते किरिस्तावांचे सण ?
दोनतीनदा ईद आणि अजुन एखादं मुहर्रम किंवा उरुस आणि त्याच्या सोबतीचे ताबूत आणि त्याच संगतीत स्वतःला आणि शिमग्याच्या देवांना वाहणारे पालखीचे भोई
बास ???
पुरतील नां ?
हा प्रश्नच मुळी आता रद्द केला पाहीजे हो !
कारण पुरते उमगले असे फार कमी क्षण जिन्दगीत येतात
येतातच फक्त कारण आपण त्यांच्यासोबत राहायला कबूलच नसतो
बघा नां !!!
गांधी नोटांपुरते
आंबेडकर कोटापुरते
शाहू आणि शिवबा फोटोपुरते
आपल्यापुरतं नक्कीच बघावं यार सव्वालच नाही पण
नेमकं त्या त्या वेळेचं फायद्याचं गणित बेभरोशी असतं हो
आजही आपल्यापैकी अनेकांच्या घरची सकाळ रेडिओच्या आवाजानं होत नसेलही पण खिडकी उघडी टाकुन बघा कधीतरी
कुठुनसं
" जाऊ देवाचिया गावा
घेऊ तेथेचि विसावा "
असं काहीतरी किंवा भले सकाळ सरत आलेली असतानाही होनाजी बाळाचं " उठा उठा सकळीक "
कानावर आलं नां तर सॉलिड मस्त वाटतं...
करुन तर बघा कधी
आलेले वाईट अनुभव
घडलेल्या अत्यंत विदारक घटना
या आपल्याला पुसता येत नाहीत हे मान्यच पण याचा अर्थ त्याच उराशी ठेवून काहीही साध्य होणार नाहीये यार !
मला दहावीच्या मार्कांवर ब्राह्मण म्हणून मिळालेली ओपन वागणूक आणि माझ्या दोस्ताला मिळालेली स्पेशल कोटा सीट यातली तफावत तो किंवा मी कधीच भरुन काढू शकणार नाही पण आज दोघे आपपल्या ठिकाणी यशस्वी आहोत हे आणि आमची मैत्री तशीच आहे हे जास्त महत्वाचे वाटते आणि तसेच आहे
गोडसे ब्राह्मण होते म्हणून समस्त ब्राह्मण समाजावर खुन्नस बाळगणारे आजही आहेत राहतील
पण त्यानं हाती काय लागतं हे कुणीच सांगू शकलं नाहीये आणि सांगू शकणारही नाही...
कुणाचीच पुण्याई किंवा कधीच्या काळातला दोष जर आज वागवायचा ठरवलं तर पुढं कधी जायचं ?
सख्ख्या नातेवाईकांचा फोटो टांगल्यावर किंवा विधि वगैरे असल्यास ते झाल्यावर शोक संपवून आयुष्य पुढं न्यावंच लागतं आणि त्याला पर्याय नाही
चांगल्यावाईट घटनांच्या वेळेस त्याची याद येणंही स्वाभाविक आहे पण म्हणून रोजचं जीणं बंद करुन चालत नाही
आज कुछ तूफानी करते है म्हणून तूफ़ानी घडत नाही तूफ़ान आधी मनात घोंघावतं मग कृतीत येतं
असंच सुन्न होणं नशीबी आहे म्हणून बसलो तर हाती
" तुझ्यामाझ्यासवे कधी गायचा पाऊसही " असंच वाटणार आणि
सुन्न असण्यातली खिन्नता झटकली की मग मन म्हणतं
" पाऊस आवडत नसला तरी ती त्याला आवडते , पावसासकट आवडावी ती म्हणून तीही झगडते "
म्हणून म्हणतो यारो !
साँसे ज़रूरी है ह़ी बिलकूल ज़रूरी है ।
गिनना हैं तो जीया हुए हर लम्हें को गिनो ज़िन्दगी बेशक खूबसूरत होगी ।
हर मुर्देको तो उसका कफ़न ओढ़ने के लिये सिर्फ़ तुम्हारी ही जरुरत होगी ।।
शायद जिंदगी जीना इसीका नाम है ।
© प्र...साद