१)
रुतल्या मनात त्या सहजी खुणा
ना पुसले ना पाहिले त्या व्रणा
आपुले ओझे माझेच मी वाहित राहिलो
तेच जुने रान , अन् आपुल्या पाऊलखुणा !
२)
पहाटेची साद
कोकिळेचा नाद
वासुदेवाची वीण
मम मित्रांची याद !
३)
हरण्याचा तुझा काही स्वभाव नाही
माझाही जिंकण्याचा अट्टाहास नाही
मी शब्द सांडणे बंद केले
तुला वाटले तू युद्ध जिंकले
वादाला प्रतिवाद हे एकच काही उत्तर नसते
युद्धात सर्व क्षम्य असले जरी
राधेयाचे स्थान अढळ असते !
४)
मी परत एक चहा मागणार
तिच्या सांगण्यानुसार माझा फक्त सहावाच कप असणार
चहा किती प्यावा याचे लिमिट सुद्धा तीच ठरवणार
मी माझा हट्ट अजिबात नाही सोडणार
ती सुद्धा तिचा शब्द खाली नाही पडू देणार
शेवटी उठून माझेच मला चहाचे आधण ठेवावे लागणार
काय रे देवा !!!
( संदीप खरे माफ करा )
५)
काही जुन्या जखमा , काही आठवणी
खपल्या पडल्या , व्रणाच्या मात्र साठवणी !
६)
आठव येतो तो
बरसल्यासारखा येतो
मेघ निळेशार अन् डोळे मिट्ट भरून येतात !
पायरव जरी जाणवला तरी ......
हलकेच डोळे टिपून घ्यावेत
शेवटची भेट टीपकागद दिल्याची आठवण स्वत:ला करून द्यायला
एकदा दिलेल्या जखमा बुजल्या की व्रणाकडे कधीच नाही पहायचे
व्रण बाळगणाऱ्याला त्रास होतो !!!
७)
मी समजावितो मनाला
आयुष्याचे गाणे सुंदर सुरेल आहे
मन होते फुलपाखरू
गंध नाही अबोलीत पण
प्राजक्त क्षणभंगुर आहे !
८)
क्षणाक्षणाला तुझी आठवण
सोबत माझ्या पळभराची साठवण
उर अजून तुझ्याचसाठी धपापत आहे
त्यावरून मी जिवंत असल्याची लोकांची समजूत आहे !
९)
प्रेमाचा कां कधी दिवस असतो ?
प्रेम म्हणजे काय असते ?
आपलेपणाला मनापासून आपलेपणानी दिलेली साद की तोच असतो प्रेमाचा दिवस
अन् त्याला आलेला प्रतिसाद म्हणजे प्रेम ...
आपलं माणूस आपलं ...............
१०)
मातीतुनी गंध फुले ,
जणू घन पावसाचा सडा !
कुणा कधी कळेल कां ,
कसा भरला हा आसवघडा ?
प्र....साद जोशी
पुणे
२०.०३.२०१०