चोचौचंचः जे मनात उमटतं ते तसं तसंच्या तसंच

Saturday, March 20, 2010

माझ्या SMS कविता .......

१)
रुतल्या मनात त्या सहजी खुणा
ना पुसले ना पाहिले त्या व्रणा
आपुले ओझे माझेच मी वाहित राहिलो
तेच जुने रान , अन् आपुल्या पाऊलखुणा !
२)
पहाटेची साद
कोकिळेचा नाद
वासुदेवाची वीण
मम मित्रांची याद !
३)
हरण्याचा तुझा काही स्वभाव नाही
माझाही जिंकण्याचा अट्टाहास नाही
मी शब्द सांडणे बंद केले
तुला वाटले तू युद्ध जिंकले
वादाला प्रतिवाद हे एकच काही उत्तर नसते
युद्धात सर्व क्षम्य असले जरी
राधेयाचे स्थान अढळ असते !
४)
मी परत एक चहा मागणार
तिच्या सांगण्यानुसार माझा फक्त सहावाच कप असणार
चहा किती प्यावा याचे लिमिट सुद्धा तीच ठरवणार
मी माझा हट्ट अजिबात नाही सोडणार
ती सुद्धा तिचा शब्द खाली नाही पडू देणार
शेवटी उठून माझेच मला चहाचे आधण ठेवावे लागणार
काय रे देवा !!!
( संदीप खरे माफ करा )

५)
काही जुन्या जखमा , काही आठवणी
खपल्या पडल्या , व्रणाच्या मात्र साठवणी !
६)
आठव येतो तो
बरसल्यासारखा येतो
मेघ निळेशार अन् डोळे मिट्ट भरून येतात !
पायरव जरी जाणवला तरी ......
हलकेच डोळे टिपून घ्यावेत
शेवटची भेट टीपकागद दिल्याची आठवण स्वत:ला करून द्यायला
एकदा दिलेल्या जखमा बुजल्या की व्रणाकडे कधीच नाही पहायचे
व्रण बाळगणाऱ्याला त्रास होतो !!!

७)
मी समजावितो मनाला
आयुष्याचे गाणे सुंदर सुरेल आहे

मन होते फुलपाखरू
गंध नाही अबोलीत पण
प्राजक्त क्षणभंगुर आहे !

८)
क्षणाक्षणाला तुझी आठवण
सोबत माझ्या पळभराची साठवण
उर अजून तुझ्याचसाठी धपापत आहे
त्यावरून मी जिवंत असल्याची लोकांची समजूत आहे !
९)
प्रेमाचा कां कधी दिवस असतो ?
प्रेम म्हणजे काय असते ?
आपलेपणाला मनापासून आपलेपणानी दिलेली साद की तोच असतो प्रेमाचा दिवस
अन् त्याला आलेला प्रतिसाद म्हणजे प्रेम ...

आपलं माणूस आपलं ...............
१०)
मातीतुनी गंध फुले ,
जणू घन पावसाचा सडा !
कुणा कधी कळेल कां ,
कसा भरला हा आसवघडा ?

प्र....साद जोशी
पुणे
२०.०३.२०१०

Wednesday, March 17, 2010

आनंदगीत

जगणे माझे आनंदगीत आहे
हृदय भंगणे ही तर जनरीत आहे
हरवली जरी किती नाती इथली
मनी माझ्या सर्वांसाठी प्रीत आहे

Tuesday, March 2, 2010

जगण्याचा हा खेळ

प्राजक्त हातात तसाच राहिला
हात केशरी, तरी रिताच दिसला
गंध आयुष्यभर उरला
मी उदास .......

निरांजनाची वात तेवली
गाभाऱ्यात उजेड उमटला
क्षणात तोही मावळला
मी उदास ........

जगण्याचा कंटाळा आला
भरतीमध्ये जीव लोटला
श्वास लाटेवर तसाच राहिला
मी उदास ......

भीक म्हणुनी म्हणले जगला
पदर आईचा उगीच विरला
जगण्याचा हा खेळ विस्कटला
मी उदास ......

प्र....साद जोशी
पुणे
०३.०३.२०१० 

काळजाच्या कुपीत

जाशीलही विसरुनी तू मजला !
नाव माझे , आवाज माझा ! कदाचित मी कोण हे देखील !!!
जरी विसरलास आज मजला,
तरी काळजाच्या कुपीत असेल अस्तित्व तुझे कायम !!!!

Pra,,,,saad 

Monday, March 1, 2010

केसरबागेची रंगपंचमी !

केसरबागेची रंगपंचमी !
 
आज खरेच खूप काही गमावल्यासारखे वाटते आहे ,
मधल्या गच्चीतली होळी & रंगपंचमी आता कुणालाच खेळता येणार नाही !

आज खरेच खूप काही गमावल्यासारखे वाटते आहे ,

खरे तर त्याही वेळी दोन वेगळ्या इमारती होत्याच की ,
पण त्यावेळी मधला जिना दोन्ही बाजूंना जोडणारा होता !
आताही दोन विंग आहेत पण जोडणारा जिना मात्र .......
आज कुणी कुणाला हक्कानी खाली बोलावेल कां हो ?

आज खरेच खूप काही गमावल्यासारखे वाटते आहे ,

नंदाकाकू , मंजिरीकाकू , माधवीवहिनी,किर्ती, भारती ,सगळ्या बायकांना बाहेर काढायच्या ,
मकवाना आंटी, घुगरे काकू , हर्डीकर वहिनी आडून आडून का होईना पाणी ओतायच्या !
सुशील, अल्ल्या, बाबू, मी , अनिरुद्ध , मंदार सगळ्या काका लोकांना बाहेर काढायचो,
फक्त टिळा टिळा म्हणत बादल्या उलट्या करायचो , आता काकांवर हक्क गाजवावा असे काका उरले आहेत कां हो ?

आज खरेच खूप काही गमावल्यासारखे वाटते आहे ,

बराच वेळ झाला की राधा सदन मधून आपल्यावर आणि इकडून त्यांच्यावर मारा व्हायचा ,
आज मया , निनाद , राजेश , रत्ना , मिनारदादा बाहेर तरी पडतील कां हो ?
सगळे रंग अन् पाणी संपल्यावर पंडितच्या बाजूच्या त्या जुनाट पिम्पातली माती फेकायचो ,
आज स्वामी नारायण मध्ये येणाऱ्या लोकांच्या शिव्या खायला कुणी तयार आहे कां हो ?

आज खरेच खूप काही गमावल्यासारखे वाटते आहे ,

कालच गुरुकृपेतल्या अरुंधतीचा मेल आला की आता आमची सद्दी संपली तरी ओंकारची टीम जोरात आहे ,
पण प्रश्न एकच आहे ??? नवे लोक जुन्या रितीत मिसळून घ्यायला तयार आहेत कां हो ?
ओंकार, निहार, रितेश, आदित्य सगळे खूप काही सगळे छान पार पडतील खात्री आहे मला ,
पण परत अजून एक प्रश्न आहेच? सगळे तसेच नीट पद्धतीने करतील नां ? गालबोट तर लागणार नाही नां ???

आज खरेच खूप काही गमावल्यासारखे वाटते आहे ,
नवे सगळे झाले आहे , जुना सूर कुठेतरी हरवला आहे
आज खरेच खूप काही गमावल्यासारखे वाटते आहे ,
गेलेल्यांची फ्रेम मनावर मणभर ओझे ठेवते आहे !!!

आज खरेच खूप काही गमावल्यासारखे वाटते आहे ,

सचिन बेस्टच आहे पण गावस्करला विसरता येत नाही ,
स्पिन कुणीही टाकेल पण बंडा सारखा कुणाचा बॉल वळणार नाही
परत एकदा नयनीश ,मी, मया, बाबू खेळायला उतरू पण ...............
सुशील , रत्ना , मिनार चे बॉल चे छ्प्पे पाठी पोटावर घेऊन घरी कुणी जाणार नाही !

आज खरेच खूप काही गमावल्यासारखे वाटते आहे ,

आजच्या केसरबागेला बोक्याचा सलाम
आमच्या त्या वाडीला कायमचा अलविदा !
गांधीशी परत KUM ची मीटिंग होईलही
गांधी म्हणजे काय ते सांगायला कुणीही उतरणार नाय .......

आज खरेच खूप काही गमावल्यासारखे वाटते आहे ,

विली, बिपीन नंदू आणि आनंद काका आता हातात oil paint घेऊन असणार नाहीत ,
घरी अंग साफ करायला & शिव्या घालायला रॉकेलच्या बाटलीसोबत आई वाट पहाणार नाय !
मी आता मागच्या डायर्या फाडायला सुरुवात केली आहे ,
नवी विटी नवे राज्य , कुणीतरी नवी डायरी लिहायला सुरुवात करायला पायजे हाय !

प्र......साद जोशी .