सांजवेळ ही अजुनी कातर ,
जीवघेणी दररोज येते
मग सरता सरता रात्र ही उरते ,
पहाटेची रोज वाट पाहते !
सतत असतो तुझाच वावर ,
मनातील सर्व मनातच रहाते
मग खांबामागुन लपून पहाते ,
उन्हे रोजची किलबिल न्हाते !
मी तर वेडा या तीरावर ,
पारावर ती बसून रडते
लांब सावली पडते जेव्हा
अश्रुपुरात ती नदी थांबते !
वहात जातो पैलतीरावर ,
गात्रागात्रातुनी रक्तही थिजते
मागमूस ना काही उरतो
मम श्वासांचे बंधन संपते !
शेवट उरतो एकच काहूर
नदीला मग येतो गहिवर
नेते मजला मातीसंगत
ध्यान, समाधी, थडगे उरते !
जाणे येणे रोजचेच ते ,
वहिवाट ही रोजचीच ती
लिंपण होते थडग्यावरी
सुकल्या अश्रुंचे ते प्राजक्त होते !
प्र.....साद जोशी.
२२.०२.२०१०
पुणे
No comments:
Post a Comment