चोचौचंचः जे मनात उमटतं ते तसं तसंच्या तसंच

Thursday, July 14, 2011

एकच सुखाचं स्वप्न पुरेसं नाहीये कां काही लिहायला ?

काय रोज रोज दुखः कुरवाळत एखादी कविता लिहायची ?
एकच सुखाचं स्वप्न पुरेसं नाहीये कां काही लिहायला ?
रोज रोज एक दिवस पार पडला कशाला म्हणायचं ?
उद्याचा दिवस किती सुरेख असणार आहे असं कां नाही बोलायचं ?

उद्या सकाळचा कितीचा गजर लावायचा असं कशाला बोलायचं ?
आजची रात्र सुरेल स्वप्नात जाणार आहे असंच नाही कां बोलायचं ?
सकाळचा पेपर उघडून उगीच वाईटसाईट बातम्या कशाला वाचायच्या ?
छान कॉम्पुटर उघडून फेसबुक वर मित्रांना शुभ प्रभात कां नाही बोलायचं ?

ऑफिसला पोचून फाईलचा गठ्ठा पाहून तोंड कशाला वाकडं करायचं ?
दुपारी डब्याचा आस्वाद घ्यायचा आहे हे मनात कां नाही आणायचं ?
संध्याकाळ होता होता घड्याळ लवकर पुढे कां सरकत नाहीये असं मनात कां आणायचं ?
स्टेशन वरचा गजरेवाला आणि बायको आपली वाट पाहताहेत असं स्वतःला कां नाही विचारायचं ?

एक विचारू कां मित्रांनो ?
आपलं आपण आपल्यासाठी कधी हो जगायचं ?
इतके सोबती असतात नां ?
मग उगीच माझ्या बाबतीतच असं कां होतं असं कां कुढत जगायचं ?

आता ठरवून टाका स्वतःशीच माझं जग मीच आहे बांधायचं ...
घरट्यातले सगळे सुरक्षित आहेच, अता जरा आजूबाजूला सुद्धा पाहायचं
माझं दुखः मला ठाऊक नाहीये हे स्वतःला शेवटचं सांगून टाकायचं
जगभर फक्त सुख आहे ते गोळा करायचं अन् वाटत सुद्धा फिरायचं !

प्र...साद जोशी.
पुणे
१२.०७.२०११