तुला आठवताहेत कां ती पत्रं ,
जी मी कधीच पाठवली नव्हती !
माझा पाठपुरावा करताहेत तुझी निरुपयोगी जीवनसूत्र ,
मी कायम तुझीच असले तरी जी कधीच पाळली नव्हती !
असेल कां कधी पुढला जन्म ?
जो कुणीच कधी पाहिला नाहीये !
घेवून येशील कां कधी उत्तरासकटचा प्रश्न ?
मला आयुष्यभर तुझ्यासाठी दीपस्तंभ व्हायचे नाहीये !
कधीतरी अशी निजलेली रात्र येऊ देणार आहेस कां ज्यात तू नसशील ?
अख्या अंगभर गुरफटून घेतलेल्या गोधडीतल्या तुझा गंध तसाच असेल !
येवू देणार आहेस कां कधी अशी पहाट ज्यात तुझी स्वप्ने नसतील ?
चहा करेन एकटीसाठी सकाळी , घरात एकच कप तुझ्या नावाचा असेल !
तुला कधी समजेन मी खरी ?
फलाटावरचा बाक अजून वाटच पहात बसेल !
मी कितीदा दिली मनापासून हाक तुला ठावूक तरी आहे कां ?
मी स्टेशनवर पोचेतो गाडी नेहमीसारखीच गेली असेल !
प्र...साद जोशी.
पुणे
०७.०७.२०१०